मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. शिंदे हे रात्री 8 वाजता श्रीनगरला पोहोचणार आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे पार पाडणार आहेत.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या आधी खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांची एक टीम काश्मीरला गेली होती. आता स्वतः एकनाथ शिंदे हे काश्मीरला गेले आहेत. एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी जाऊन आढावा घेणार आहेत.
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे.
एकनाथ शिंदे हे सातत्याने काश्मीरमधील पर्यटकांच्या संपर्कात आहेत. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर रात्री 10 ते 11 च्या दरम्यान एकनाथ शिंदे हे सर्व पर्यटकांची भेट घेणार आहेत. त्यांना मुंबईत कसं सुखरुप आणलं जाईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. या पर्यटकांची जेवणाची सोयही केली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांची एक टीम या आधीच काश्मीरमध्ये पोहोचली आहे.